Thursday, 8 December 2016

जागे व्हा

जागे व्हा
      दिवाळी संपली की लगेचच सहलीला जाण्याची तयारी सुरु होते. पर्यटनासाठी हा अतिशय सुंदर काळ असतो. थंडीला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हे वातावरण समुद्र किनारी पर्यटनासाठी तर अत्यंत आल्हाददायी असते. पण समुद्र किनारी गोवा, गुहागर, मालवण, तारकर्ली, हरणे बंदर अशा ठिकाणी जर हव्या तशा सोयी असणारे बीच रेसॉर्ट वगैरे हवे असेल तर याचे मात्र 2-3 महिन्यापूर्वी नियोजन करावे लागते. अशाच प्रकारे आम्ही यावर्षी मालवण-तारकर्ली बीच वर सहल केली. आजुबाजुच्या परिसरातील छोट्या छोट्या पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या.
      तारकर्ली बीच, देवबाग, सिंधूदूर्ग, विजयदूर्ग, रॉक गार्डन, कालनिर्णयकार, साळगांवकरांचे गणेश मंदिर, डॉल्फीन सफर, त्सुनामी बेट, अशा अनेक स्थळांना भेटी दिल्या. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर ज्यावेळी त्सुनामी प्रहार झाला त्यावेळी भूगर्भातील हालचालींमुळे तारकर्ली बीचच्या पुढे एक नविन छोटेसे बेट तयार झाले आहे. या बेटावर जाण्यासाठी छोट्या होड्या उपलब्ध आहेत. याठिकाणी पर्यटन विकास खुप फोफावत आहे. अनेक प्रकारच्या water games याठिकाणी उपलब्ध आहेत. रॉक गार्डन म्हणजे तर चमत्कारच आहे. कित्येक वर्षे अनेक दगड याठिकाणी समुद्राच्या लाटांशी खेळत आहेत. बऱ्याच ठिकाणची समुद्र रचना पाहिल्यामुळे मला याठिकाणी वेगळे असे जाणवले की या भागात समुद्रात व समुद्राच्या किनारी मोठमोठ्या दगडांची संख्या पुष्कळ आहे. याचाच उपयोग शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने करुन घेतला असणार व विजयदूर्ग आणि सिंधूदूर्ग किल्ले बांधले असणार हे नक्कीच. पर्यटनासाठी हा भाग फारच छान आहे.
      मालवणच्या किनाऱ्यावरील पाण्यात जेंव्हा आम्ही मनमुराद खेळत होतो, त्याचवेळी बऱ्याचवेळा प्लॅस्टीक पिशव्या, बाटल्या लाटांबरोबर किनाऱ्यावर येत होत्या आणि परत आंत खेचल्या जात होत्या. खरं तर रत्नागिरी, गुहागर, गणपतिपुळे या सर्वांपेक्षा याठिकाणी आम्हाला अनेक समुद्री जीव दिसले. छोटे मासे, स्टार फीश पण या सगळ्या गोष्टींचा या समुद्रजीवांना नक्कीच त्रास होत असणार असे वाटते. त्सुनामी बेटावर जाताना तर आपण केर्ली नदीच्या पात्रातून समुद्राच्या पात्रात प्रवेश करतो, तो अनुभव फार वेगळा असतो पण याठिकाणी सुद्धा पाण्यावर प्लॅस्टीक बाटल्या तरंगत होत्या. सिंधूदूर्ग किल्ल्यावर तर ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्याठिकाणी पर्यटकांनी कोल्ड्रींक्स, पाण्याच्या बॉटल्स फेकलेल्या दिसल्या. बुरुजावरुन छोट्या छोट्या खिडक्या आहेत. ज्यातून समुद्रातील दूरवरच्या हालचालींचे निरिक्षण करता येते. त्या छोट्या छोट्या खिडक्यामध्ये प्लॅस्टीक बाटल्या कोंबून कोंबून भरलेल्या दिसल्या. या गोष्टींचा मनाला खूप त्रास झाला.



      माणसाला प्रवासात त्रास होऊ नये, सर्व सोई मिळाव्यात यासाठी या सर्व गोष्टी आपणच तयार केल्या. अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी जैविकदृष्ट्या सुरक्षित पॅकेजमध्ये आपल्याला कानाकोपऱ्यात मिळत आहेत. केवढा मोठा फायदा आपल्याला या गोष्टीचा होत आहे. पण आपण त्याचे रुपांतर कशात करतो आहोत ही चिंतेची गोष्ट आहे.
      या सर्व गोष्टी पाहताना लहानपणीच्या काही घटना आठवतात. त्या वाचल्यावर कदाचित तुम्ही सुद्धा भूतकाळात जाल. साधारणपणे 82-83 च्या दरम्यान आईवडिलांबरोबर किराणामालाच्या दुकानात किराणामाल खरेदी करायला मी जायचे. किराणामालाची यादी दिल्यावर दुकानदार त्याप्रमाणे माल द्यायला लागला की त्याच्या फळीखालून आत डोकावण्यात भयंकर मजा यायची. चहा 1/2 किलो तर दुकानदार एक मोठा पत्र्याचा कंपनीचे नांव असणारा घट्ट झाकणाचा डबा माझ्या आई वडिलांना दाखवे आणि सांगे साहेब 'हे बघा आत्ताच सील फोडलंय, वास बघा कसा घमघमाट येतोय. एकदम प्युअर कंपनीचा चहा' आणि मग तो त्याचे पॅकिंग एका खाकी पिशवीत करुन देत असे. अशा सर्वच गोष्टी मोठमोठाल्या पॅकिंगमधून येत. अगदी तेल सुद्धा आपापल्या किटल्यांमधून सर्वजण वाण्याकडून मोजून आणत. पॅकिंग मधल्या वस्तूंमधे एखादीच वस्तू मिळे. उदा. पेस्ट आणि काडेपेटी या दोनच्या खोक्यांसाठी आम्ही भावंडे भांडत असू. प्लॅस्टीक पिशवीत पॅकिंग केलेल्या तर वस्तूच नसत. सर्व खाकी पिशव्या नाहीतर वर्तमानपत्राचे कागद आणि त्याला दोरा बांधलेला.
      या गोष्टींचा विचार याठिकाणी करण्याचे कारण हेच की खरंच हीच पद्धत बरोबर होती का ? कारण आत्ता बघा एकवेळचा चार माणसांचा एक महिन्याचा किराणामाल आणला की कमीतकमी 25 प्लॅस्टीक पिशव्या जमा होतात. पाच-सहा खोकी जमा होतात.पूर्वीच्या काळी दानधर्म म्हणून लोक ठिकठिकाणी वाटसरुंच्या पाण्याची सोय करायचे. पाणपोई बांधायचे. मग त्या स्वच्छ ठेवणे, त्यात पाणी भरणे हे पुण्य म्हणून केले जायचे. त्यामुळे वाटसरुंना पाणी पिताना खात्री वाटायची. आता असे होत नाही.
      पूर्वी दवाखान्यात आपण आपापली औषधाची बाटली घेऊन जायचो आणि वैद्य त्यात औषध भरुन द्यायचे आता .....
      मग सर्वच गोष्टींचा सखोल विचार केला तर असं लक्षात येतय की, मनुष्य स्वार्थी झालाय. अविश्वास, चुरस, आळशीपणा, सुखासीनता, Instant या सर्व दुर्गुणांमुळे अशा shortcuts ची गरज निर्माण होत आहे.मग अस जर प्रत्येक घरटी होतयं तर आपण किती भौतिक कचरा गोळा करतोय याची विल्हेवाट आपण कशी लावणार? दुधाचे उदाहरण सुद्धा तुम्हाला आठवेल, पूर्वी गवळी मोठ्या किटलीतून दूध आणायचा आणि मापाने आपल्या पातेल्यात ओतायचा. पण आता प्रत्येक घराघरात प्लॅस्टीक पिशवीतूनच दूध पोहोच होते. भले अगदी तुम्ही पुर्नचक्रिकरण होणारे प्लॅस्टीक वापरलेत तरी त्याच्यावर होणारा खर्च हा त्या उत्पादनावरच लावला जाणार आणि या वागण्यातून असाच भौतिक कचरा निर्माण होत जाणार. मग त्याची विल्हेवाट आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे लावणार. अगदी ऐतिहासिक, धार्मिक स्थळे सुद्धा आपण सोडणार नाही.
      विश्वासाचा भाग ज्याठिकाणी कमी होतो तिथे आपण पर्याय निव़डायला सुरुवात करतो. मग व्यापारी व ग्राहक यांच्यातील विश्वासाला तडा गेल्याने हे सर्व चक्र सुरु झाले. जर सर्वांनीच एकमेकांवरील विश्वास दृढ केला तर काही गोष्टीतरी आपण टाळू शकतो. किंवा मग मनात असा विचार येतो की खरंच पापपुण्याच्या भितीने जर माणूस नियमाने आणि इतरांना त्रास न होता वागत असेल तर हीच कल्पना योग्य होती का ? आपण कांही गोष्टींना, प्रथांना खरंच मोडीत काढून चूक करतोय का ?
      कारण माणसाची सध्या वृत्तीच अशी आहे की,
      फलं पुण्यस्य इच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः ।
      फलं पापस्य नेच्छन्ति पापं कुर्वंन्ति नित्यशः ।।
      पुण्याचे फळ हवे आहे पण पुण्य करायचे नाही आणि पापाचे फळ नको आहे पण पाप नेहमीच करायचे. म्हणजे थोडक्यात आम्ही कचरा निर्माण करणार आणि तो स्वच्छ करण्याची जबाबदारी शासनाची, सामाजिक संस्थांची किंवा मी सोडून इतर कुणाचीही. साधा विचार आहे पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टीक मूक्त गांव, शहर अशा कितीतरी संकल्पना अनेक सामाजिक संस्थांकडून राबविल्या जात आहेत. पण हा मुळात प्रश्न निर्माण का झाला आहे याकडे देखील गांभीर्याने आपण पाहुया असे मला वाटते. प्रत्येकवेळी प्लॅस्टीक पिशवीचा अट्टाहास नको. शिवाय ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्वतः पाणी इ. नेणे शक्य आहे, पदार्थ डब्यातून नेणे शक्य आहे तिथे तिथे ते नेऊया. डिस्पोजेबल वस्तूंच्या ऐवजी घरातील पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करुया. यामध्ये घासण्याचे, पुसण्याचे कष्ट वाढतील पण पर्यावरण रक्षणाचे मोठे कार्य आपल्या हातून घडेल, आणि ते स्वतःपासूनच केले पाहिजे हे नक्की.    


माधुरी अभय कुलकर्णी
कन्याशाळा कराड.

              

Saturday, 3 September 2016

समर्पयामि संस्कृताय जीवनम् ।

तावदेषा देवभाषा, देवी स्थास्यति भूतले ।
यावच्च वंशोsस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ।।

    संस्कृतच्या बाबतीत एक सुभाषितकार वरीलप्रमाणे गौरवोद्गार काढतो की या पृथ्वीतलावर जोपर्यंत नद्या, पर्वत इ. आहेत तोपर्यंत ही देवभाषा प्रचलित राहील. खरोखरच ही देववाणी, गीर्वाणवाणी संस्कृत भाषा अत्यंत मधुर आणि मंजूळ आहे. सध्याच्या काळात मात्र नित्य उपयोगात ती आणली जात नाही. कर्नाटकातील मत्तुर या गावी मात्र ती आपल्याला जिवंत दिसते. हे एक खेडेगांव आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या सर्व मंडळींची रोजची व्यवहार भाषा संस्कृत आहे. खरं तर अनेक भाषांची जननी ही संस्कृत आहे. लॅटीन, जर्मनी, रशियन, रोमन या परकीय तर हिंदी, काश्मिरी कानडी, उर्दू, मराठी इ.अनेक भारतीय भाषांमधील शब्दांची व्युत्पत्ती आपल्याला संस्कृत भाषेत दिसते. या भाषेच्या साहित्याला 5000 वर्षांचा अत्यंत प्रगल्भ इतिहास आहे. पण काळाच्या ओघात ती जपजाप्य -स्तोत्रे इ.पुरती मर्यादित आहे असा घातक विचार पसरत गेल्याने ती मागे पडत गेली. खरं तर संस्कृत भाषेएवढी नूतनता, रसिकता, वैज्ञानिक दृष्टी, कलात्मकता कोणत्याच भाषेत नाही. फक्त बऱ्याच ठिकाणची उदाहरणे ही गोष्टीरुपात साहित्यात पेरली गेल्याने आपला त्यावर विश्वास बसत नाही. राक्षस-देव यांच्या युद्धात- डोळे शस्त्रक्रिया करुन बसविले, रामायणात- पुष्पक विमान वापरले, महाभारतातील मयसभेची रचना, कणाद ऋषिंचा पिलवः पिलवः करत प्राण सोडल्याचा दाखला, कोsरुक कोsरुक (निरोगी कोण आहे) असे म्हणत फिरणारा पक्षी -          ( आयुर्वेदाचा मोठा मंत्र सांगून जातो - हितभूक, मितभूक, ऋतभूक ...
    वरील सर्व उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की "काखेत कळसा आणि गावाला वळसा" अशी आपली स्थिती झाली आहे. आपला जो 'प्रगल्भ वारसा' rich heritage तो आपण विसरत चाललो आहे. 1991 आणि 2001 साली झालेल्या जनगणनेनुसार अनुक्रमे 49736 आणि 14135 लोकच संस्कृत ही आपली मातृभाषा म्हणून वापरतात.
    मग जर ही भाषा आपल्याला मृत होण्यापासून वाचवायची असेल तर सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. परकीय विद्यार्थी, विद्यापीठे येऊन आपलाच कच्चा माल नेऊन पक्का करुन आपल्याला नवीन आवरणात-आकर्षकरित्या सादर करतात आणि आपण ते पहात बसतो हे कितपत योग्य आहे ?
    खरं तर संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी अशी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची खूप इच्छा होती. डॉ.आंबेडकर हे संस्कृत विषयाचे अत्यंत चांगले जाणकार होते. संस्कृत भाषा आपली आहे व ती रहावी यासाठी त्यांनी संसदेत संस्कृतमधूनच विचार मांडले होते पण काही कारणास्तव हा विचार मागे पडला.
    सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर संस्कृतभाषा ही शाळाशाळांमधून शिकविली जाते. भारतातील कार्यरत असणाऱ्या प्रत्येक विभागीय मंडळांची याबाबतीतली भाषा रचना मात्र भिन्न आहे. काही विभागांनी तिला व्दितीय भाषा म्हणून स्वीकारली आहे. काही विभागांनी तृतीय भाषा म्हणून तिचा स्वीकार केला आहे. काही ठिकाणी ही भाषा 6 वी पासून शिकविली जाते तर काही ठिकाणी ती 8 वी पासून परिचित होते. महाविद्यालयीन व उच्च शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर भारतात संस्कृतसाठी अनेक विद्यापीठे कार्यरत आहेत. पण या विद्यापीठांना चांगले विद्यार्थी कमी पडत आहेत. यासाठी माध्यमिक स्तरावर अनेक बदल घडणे आवश्यक आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थी फक्त गुण मिळवून देणारी भाषा एवढाच मर्यादित विचार तिच्या बाबतीत करतात.
    सन 2014-15 पासून संस्कृत विषयाच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की संस्कृत विषयाची प्रश्नपत्रिका नको तर तिची कृतिपत्रिका असावी. 14-15 पासून आठवी-नववी तर यावर्षी इयत्ता 10वी साठी हा बदल सर्वत्र ग्राह्य धरला आहे. हा बदल अत्यंत सकारात्मक आहे. ज्याप्रमाणे इंग्रजीची प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये , हिंदीची हिंदी मध्ये आहे त्याप्रमाणे संस्कृतची संस्कृतमध्ये. यामुळे विद्यार्थी व शिक्षक संस्कृत भाषा परत एकदा संवादात, रोजच्या वापरात आणतील, छोटी छोटी वाक्ये बनवतील अशी अपेक्षा आहे. याठिकाणी एक मोठी दरी अशी निर्माण झाली आहे की आत्ता जे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत ते जेंव्हा शिकले त्यावेळी आठवीपासून उच्चशिक्षणापर्यन्त संपूर्णपणे भाषांतर पद्धतीनेच शिकविले जात होते. त्यांच्यासाठी हा communicative approach अत्यंत नविन आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान नवी दिल्ली, संस्कृत भारती अशा काही संस्थांचे यासाठी पत्रद्वारा, प्रशिक्षणे, संभाषण वर्ग उपलब्ध आहेत. याचा नक्कीच उपयोग शिक्षकांना होईल. जर आपण अजूनही दूरदृष्टीने विचार केला तर अशा प्रकारे संस्कृत शिक्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक क्षितिजे खुली होतील.
    जगाला मार्गदर्शक असणारी आयुर्वेद ही पद्धती भारताकडेच आहे. सध्या आयुर्वेदातील उपचार पद्धतीवर संशोधन सुरु आहे. गणितातील अनेक क्लिष्ट संकल्पनांचा विचार भास्कराचार्यांनी लिलावती ग्रन्थात केलेला आहे. त्याचे पुनरोज्जीवन करणे आपल्याच आतात आहे. धातूमिश्रणशास्त्रा विषयी संस्कृतमध्ये अनेक ग्रन्थ उपलब्ध आहेत. दिल्ली येथील स्तूप हजारो वर्षे झाले तरी अजूनही ऊन, पाऊस, थंडी झेलत आहे. ज्योतिषशास्त्र हे अत्यंत शास्त्रीय बैठक असणारे श्सात्र आहे. तारांगणातील अनेक ग्रहांचा प्रभाव ऋतुमान, मानवी जीवन, पशुपक्षी, प्राणी यांवर कसा पडतो याचे विवेचन आहे. उत्तम पुरुष लक्षणे, वास्तु बांधणीसाठी चांगली जमीन कशी निवडावी, उत्तम अश्व कसा निवडावा, विमान बांधणी, जहाज बांधणी, कृषिकर्म, नाट्य, साहित्य, संगीत एक ना अनेक विषय संस्कृतात आहेत. आर्यचाणक्यांचा अर्थशास्त्र ग्रंथ तर आजही प्रत्येक अर्थतज्ञांनी संदर्भग्रन्थ म्हणून वापरावा. संस्कृत ही भाषा व्याकरण दृष्ट्या जर्मन भाषेशी साधर्म्य असणारी आहे त्यामुळे जर्मन भाषा संस्कृत येणाऱ्यांना  लवकर समजते.
    या सर्व प्राचीन ग्रन्थ संपदेतून संशोधन करण्यास खूप वाव आहे. आपले विद्यार्थी फक्त काहीच क्षेत्रांकडे ( इंजिनिअर व मेडिकल अँलीओपॅथी) आपली शक्ती लावत आहेत.
    कित्येक वर्ष हळद ही घराघरात वापरली जायची. तिच्यातील अनेक गुण आपल्याला माहिती होते. पण अमेरिकेने त्यावर जेंव्हा मालकी हक्क सांगितला त्यावेळी आम्हाला जाग आली. मा.डॉ.माशेलकर यांनी यासाठी खुप मोठा लढा देऊन याची मालकी भारताकडे ठेवली. पण अशा अनेक गोष्टी आमच्याच आहेत पण त्या आम्हाला माहित नाहीत अशी आमची अवस्था आहे.
    या क्षेत्रांची माहिती करुन घेऊन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्यात (माध्यमिक गटातच) संस्कृतची आवड व जागृती निर्माण केली पाहिजे नाहीतर हा आपला ठेवा नष्ट होईल व हळहळ करण्याव्यतिकीक्त आपण काहीच करु शकणार नाही. आज माध्यमिक स्तरावर अशा अनेक शाळा माझ्या पाहण्यात आहेत की त्याठिकाणी असणारा संस्कृत विषय -संस्कृत शिक्षक नसल्याने बंद पडला आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाला जशी हिंदी-राष्ट्रभाषा, मातृभाषा येते तशी संस्कृत आलीच पाहिजे. त्यासाठी आत्ताच्या संस्कृत जाणकारांची खालील भूमिकाच असली पाहिजे.
    समर्पयामि संस्कृताय जीवनम् ।




                                          माधुरी अभय कुलकर्णी 

स्मार्ट खेड्यांकडे चला

प्रस्तावना

       सध्या स्मार्ट हा शब्द अगदी सतत कानावर पडतोय. रोजच्या वर्तमानपत्रात एकतरी बातमी या स्मार्ट वर असतेच. त्यातही स्मार्ट सिटी योजना हा तर आपल्या औत्सुक्याचा विषय झालाय. मग विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट म्हणजे आपण थोक्यात काय सांगू शकतो तर -
       सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने असणे म्हणजे 'स्मार्ट' ही कल्पना. मग स्मार्ट सिटी किंवा शहरांना स्मार्ट करायचे म्हणजे काय ? तर शहरातील प्रशासकीय सेवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. नागरी सुविधा वाढल्या पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम व स्वस्त,दर्जेदार शिक्षण विविध क्षेत्रांतील उद्योग आकर्षित त्याठिकाणी होवून रोजगार निर्माण झाला पाहिजे. अशा शहरांना आपण स्मार्ट म्हणणार आहोत मग अशी शहरे सध्या अस्तित्वात नाहीत पण नियोजनबद्धपणे त्यांचे रुपांतर अशा स्मार्ट शहरांमध्ये करता येणार आहे अशी 100 शहरे शासनाने या आराखड्यात गृहीत धरली हेत. अशा स्मार्ट शहरांमध्ये सर्वांगीण विकासाकरीता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा उपयोग केल्यामुळे शहरी-गरीब आणि वंचित घटकांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
       हा सर्व झाला भविष्यकाळ. पण वर्तमान काळात काय परिस्थिती आहे हे होऊ घातलेल्या नागरिकांसमोर म्हणजेच आताच्या विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी आम्ही शालेय सत्रावर एक सर्वेक्षण केले.

उद्दिष्टे

1.     विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची माहिती गोळा करणे.
2.     त्यांचे शिक्षण, कामाचे ठिकाण, स्वरुप, वेळ, अडचणी, फायदे, यांची माहिती घेणे.
3.     स्वतःच्या गावात नोकरी न करण्याची कारणे जाणून घेणे.
4.     कमाल तरुणांची संख्या बाहेरगावी / परदेशी असल्याने कुटुंब व्यवस्थेवरील त्याचा परिणाम जाणून घेणे.
5.     आरोग्यावर झालेला परिणाम.
6.     मोठ्या शहरांवर व खेड्यांवर लोकसंख्येच्या स्थलांतराने झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे.
7.     सर्व समस्या विद्यार्थिनींना माहिती करुन देणे व आपले करिअर निवडताना योग्य दिशा मिळवण्यासविचार प्रवृत्त करणे.
8.     कल चाचणीचे गांभीर्य लक्षात आणून देणे.

कार्यवाही
       दिवाळीपूर्वी विद्यार्थिनींना आपण करत असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याचे महत्व पटवून दिले. विद्यार्थिनींच्या मदतीने प्रश्नावली तयार केली. सुट्टीला जाण्याच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनींना प्रश्नावली छापील स्वरुपात दिली. त्याचप्रमाणे माहिती गोळा करताना प्रश्नावली सोबतच मुलाखतीचे मुद्दे ही त्यांना स्पष्ट केले. मुलाखत ही अकृत्रिम कशी होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले.
*      एकूण 200 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
*      सुट्टी संपल्यावर प्रश्नावलीवरुन माहिती संकलन केले व माहितीचे विश्लेषण केले.    

       स्व.शे.रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेतील 9अ च्या विद्यार्थिनींकडून व्यक्तीमत्व विकास अंतर्गत उपक्रम करुन घेतला आहे त्याचा हा आढावा. दिवाळीपूर्वी 67 विद्यार्थिनींनी कराड व कराड तालुक्यातील 200 घरांचे सर्वेक्षण केले. यासाठी प्रश्नावलीचा व मुलाखत तंत्राचा वापर केला. या सर्वेक्षणामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 22 ते 45 या वयोगटातील कुटुंबांची व कुटुंब प्रमुखांची माहिती गोळा केली.
       सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार नोकरी निमीत्त 200 कुटुंबापैकी
       बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांची नोकरीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

ठिकाण
टक्केवारी
पूणे
42
मुंबई
13
परदेश
4
दिल्ली
1
कोकण,सातारा,सांगली व इतर शहरे
40

       कराड व कराड परिसरातून पूणे शहरात सर्वात जास्त स्थलांतर झालेले दिसून येते.
       सर्व लोकांच्या शिक्षणाचा आढावा घेतला तर
      
कार्यक्षेत्र
टक्केवारी
इंजिनिअरींग,कॉम्पूटर,आय.टी.इ.
58
वैद्यकीय
7
शासकीय
14.5
आर्मी व पोलीस दल
3.5
कलाक्षेत्र
1
फॉरेन लँग्वेजेस
0.5
इतर
15.5

       सर्वात जास्त कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती या इंजिनिअरींग क्षेत्रात आहेत.

       बाहेरगावी नोकरी स्वीकारण्याची कारणे-
      
कारणे
टक्केवारी
गावाकडे शिक्षणाला योग्य संधी नाही
68.5
पगार कमी
13.5
इतर
17



       स्थालांतरित झालेल्य़ा कुटुंबामध्ये कौटूंबिक जबाबदारी कोण स्वीकारते ?
           
कौटुंबिक जबाबदारी
टक्केवारी
आजी-आजोबा घर सांभाळतात
17
कामाला बाई
7
पाळणाघर
12
इतर
2
बायको नोकरी करत नाही
62
      
       सर्व घरातील तरुणी या चांगल्या प्रकारे शिक्षीत असून कौटूंबिक जबाबदारीमुळे कोणत्याही 
       कार्यक्षेत्रात काम करीत नाहीत.
       राहत्या घरापासून नोकरीच्या ठिकाणी प्रवासाचा कालावधी अधिक कामाचे तास
      
कामाचे + प्रवासाचे तास
टक्केवारी
10
53.5
8
44.5
6
2

       नोकरीच्या ठिकाणी जाणेयेणेसाठी वापरली जाणारी वाहन व्यवस्था

      
वाहने
टक्केवारी
दुचाकी
35.5
चारचाकी
17.5
ऑफिसची गाडी
16.5
सार्वजनिक वाहन
30.5

       गावात नोकरी उपलब्ध झाल्यास स्वीकाराल का ? हो म्हणणाऱ्यांची संख्या 94 आहे. बाकीचे 
       गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       गावात नोकरी स्वीकारण्याचे कोणते फायदे आहेत ?
       फायदे
टक्केवारी
कुटुंबाबरोबर राहता येईल
60
शेती करता येईल
8.5
खर्चाची बचत होईल
25
इतर
6.5
      


        नोकरीच्या गावातील अडचणी व समस्या
      
       अडचणी
टक्केवारी
वाहतुकीची समस्या
39
धावपळ,निकृष्ठ जेवण इ.समस्या
19
महागाई
12.5
घराकडे दुर्लक्ष
17.5
इतर
12

       गावाकडे कोणत्या स्वरुपाचे व्यवसाय उद्योगधंदे, कंपन्या सुरु व्हाव्यात.
      
       स्वरुप
संख्या
आय.टी.कंपन्या,कॉम्प्यूटरशी संबंधित
भरपुर पगार असणाऱ्या कंपन्या
72.5

मुंबई, पुणे महानगरांसारख्या कंपन्या
19.5
कौशल्यावर आधारीत व्यवसाय सुरु व्हावेत
8

       वृद्धांच्या अपेक्षांना योग्य न्याय देवू शकत नाही असे म्हणणारे 61 टक्के लोक आहेत.

       नोकरी करुन आल्यावर पत्नी, मुले यांच्यासाठी योग्य वेळ देवू शकत नाही असे म्हणणारी 57.5 टक्के लोक आहेत. तर या दगदगीच्या जीवनामुळे 44 टक्के लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत.
       चिंतन -
       आपणांस वरील माहितीवरुन लक्षात येते की, कराड व कराड परीसरातून सर्वात जास्त स्थलांतर पूणे शहरात झाले आहे. शिक्षणाला योग्य सेंधी नाहीम्हणून अनेक कुटुंबे स्थलांतर करत आहेत. अर्थातच आजूबाजूची खेडेगावे ओसच पडत आहेत त्यामुळे स्थावर मालमत्तेचे नुकसान होत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे तर मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा पडत आहे. या सर्वाचा परिणाम तेथील नागरी सुविंधावर होत आहे. पूणे मुंबई सारख्या शहरांमध्ये पाण्याचा, जागेचा तुटवडा भासू लागल्याने आजूबाजूच्या उपनगरातून शेतजमिन बांधकामासाठी वापरली जात आहे त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करण्यास शेतजमिन कमी पडत आहे. गावाकडे तरुण मंडळींची कमतरता निर्माण झाल्याने शेती व वृद्ध माणसांच्या देखभालीचा प्रश्न गांभीर्याने निर्माण होत आहे. शहरांमध्ये आई-वडिल दोघेही नोकरीसाठी बाहेर असल्याने घरातील छोट्या मुलांचा प्रश्न गंभीर रुप धारम करत आहे. भारताची पारंपारीक एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येत आहे. संस्कार, प्रेम, भावना जपणूक, घरचा पौष्टीक हार या गोष्टी दुरावत चालल्या आहेत.
         56.9 टक्के स्त्रीया मुलांच्या संगोपनासाठी नोकरी अथवा करीअर करु शकत नाहीत. मग या स्त्रीयांच्या शिक्षणासाठी वैयक्तिक व शासकीय केलेली गुंतवणूक वाया जात आहे. याचा गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे. राहत्या घरापासून कामाचे ठिकाण लांब आहे शिवाय नोकरीचे तास कमीतकमी 10 तास असल्याने कुटुंबाला व्यायामाला व स्वतःच्या छंद जोपासण्याला वेळच मिळू शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी वैयक्तिक दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे वाहतूक जाम व प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत हे. या सर्वाचा परिणाम 22 ते 45 या वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. तरीदेखील योग्य उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे 53 टक्के लोक गावाकडे येण्यास तयार नाहीत.
       सर्वात महत्वाचा सर्वेक्षणातील मुद्दा असा दिसतो की शेती करण्याची इच्छा व शेतजमिन उपलब्ध असणाऱ्यांची संख्या ही अगदीच नगण्य आहे. टक्केवारी नुसार 8.5 टक्के लोकच उत्पादन करु शकतात आणि खाणाऱ्यांची संख्या मात्र 92.5 टक्के आहे. यावरुन अन्नधान्य टंचाई निर्माण होईल यात वादच नाही.
       वरील सर्व गोष्टींचा परामर्श घेतल्यास असे वाटते की, स्मार्ट शहरे निर्माण करण्याकडे जेवढे लक्ष दिले जात आहे तेवढेच स्मार्ट खेड्यांकडे अथवा ठराविक विकसनशील कराड, सातारा, सांगली सारख्या शहरांकडे देण्यात यावे. ( आम्हाला माहित असलेले व सर्वेक्षण करण्यास सोईचे म्हणून कराड शहर निवडले अशी प्रातिनिधीक अनेक गावे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत व त्याठीकाणीही हीच अवस्था थोड्याफार फरकाने निदर्शनास येईल यात शंका नाही.) सर्व व्यवसाय, कंपन्या,शिक्षण क्षेत्रे यांचे काहीच गावांमध्ये केंद्रीकरण झालेले दिसते. त्यांचे विकेंद्रीकरण होणे महत्वाचे आहे. तरच पूणे-मुंबई कडे जाणारा लोकसंख्येचा भार कमी होईल. शिवाय प्रगत महाराष्ट्र योजनेअंतर्गत कौशल्यावर आधारित उद्योगधंदे, व्यवसाय सुरु झाल्यास शेतीला पूरक अर्थप्राप्ती होईल.
       सर्वेक्षणातून सर्वात जास्त लोक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करत आहेत. या अनुषंगाने अनेक महाविद्यालये या 10 वर्षात ठिकठिकाणी उभी केली गेली. परंतू आता मात्र इतक्या रोजगार संधी उपलब्ध नसल्याने इंजिनिअरींग कडे जाणाऱ्यांची संख्या घटत आहे व पदवीधारक व पदवी देणारी महाविद्यालये बंद पडत आहेत.
       गावाकडची लोकसंख्या गावाकडेच राहील्याने वेळ व इंधन बचत होईल. त्याचप्रमाणे आपल्याकडे वैयक्तिक वाहन व्यवस्थेवर जास्त भर दिला जातो. यासाठी उद्बोधन करण्याची गरज आहे. एका माणसासाठी चारचाकी वापरणे हा प्रेस्टीज इशू केला जातो. परंतू तसे न होता सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला गेला पाहिजे किंवा कार पुलींगचा वापर होणे गरजेचे आहे. प्रगत महाराष्ट्र योजने अंतर्गत रस्ते, बंदर विकासासाठी 73 हजार कोटी रुपयांची योजना आखली जात आहे. यातूनच जर जलद गतीने आणि सर्वदूर अशी वाहतूक व्यवस्था लोकांसाठी उपलब्ध करुन दिली तर वरील सर्व प्रश्न मिटतील. छोटी छोटी गावे सुद्धा हवाई वाहतूक, मेट्रो सेवांनी जोडली व स्ट्रॉंग नेटवर्कींग खेड्यांपर्यंत आणले तर मल्टीनॅशनल कंपन्यांना विकसनशील गावात कंपन्या उभ्या करता येतील व गावाकडील मनुष्यबळ गावातच स्थिरावेल.
       महात्मा गांधीजींनी सांगीतलेली मूलोद्योग, व स्वयंपूर्ण खेड्यांची रचना पुन्हा एकदा साकारली जाईल.
       यातून अजूनही एक महत्वाचा मुद्दा दिसतो तो 17.2 टक्के कुटुंबातच आजी-आजोबा रहात आहेत. नातवंडांचा सांभाळ करत आहेत. मग अमेरिकेसारखी कौटुंबिक परिस्थिती आपल्याकडे निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. अमेरिकेतील अनेक वृद्ध जोडप्यांकडे पुष्कळ पैसा हे पण भावना वाटून घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी विश्वासातली रक्ताची माणसे उपलब्ध नाहीत.
  
       हे सर्व सर्वेक्षण 9 वी च्या विद्यार्थिंनीकडून करुन घेण्यामागची भूमिका काय होती ? शासनाकडून सध्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवी योजना राबविली जाणार आहे ती वरील सर्व गोष्टींना उपचारात्मक ठरेल. इयत्ता 9 वी तून 10 वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन त्यांची ज्या विषयांमध्ये गती आहे त्या विषयात त्यांना शिकण्याची मूभा दिली जाणार आहे. मग यातूनच स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणांची, कौशल्यांची माहिती विद्यार्थिंनींना होणार आहे. म्हणूनच सत्य परिस्थिती व समस्या योग्य वयात विद्यार्थिंनीच्या समोर मांडल्या तर योग्य करीअर निवडण्यासाठी त्या प्रवृत्त होतील हे नक्कीच व त्यामुळेच 2020 साली अब्दूल कलामांच्या स्वप्नातील तरुण पिढीचा योग्य मार्गक्रमण करणारा भारत देश निर्माण होईल.( या सर्वेक्षणासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका,सर्व अधिकारी व माझ्या लाडक्या 9 वी अ च्या विद्यार्थिनींचे व पालकांचे अनमोल सहकार्य लाभले)  


                                       माधुरी अभय कुलकर्णी